Friday 19 August 2011

आरक्षण : डोंगर पोखरून उंदीर काढला

"इस देश में दो भारत बसते है...' हा डायलॉग ऐकायला जबरदस्त वाटत असला तरी सुद्धा त्याची कारणमिमांसा करताना मेंदूची शकलं नाही पडली तरच नवल! या देशाची आजवरची सामाजिक स्थिती अभ्यासणाऱ्यांनी याचा पुरता अनुभव घेतलाय. हा देश स्वतंत्र्य झाल्यापासून या देशाला एक प्रश्न कायम भेडसावतोय. पण तो प्रश्न आहे की अधिकार यावरही आजतागायत एकमत होऊ शकलेलं नाही. तर याबाबतचं लोकमतही अजून स्पष्ट झालेलं नाही. आताशा एकाच देशात दोन देश राहताहेत इथपर्यंत या प्रश्नाने मजल गाठलीय. तर अशा या गंभीर प्रश्नाचं नाव आहे "आरक्षण.'  देशातील सामाजिक, आर्थिक आणि अन्य साऱ्याच बाजूने मागास असलेल्या घटकाचा विकास होण्यासाठी आवश्यक असलेली पायरी म्हणजे आरक्षण, अशी ढोबळ अर्थाने आरक्षण या शब्दाची व्याख्या करता येऊ शकते. तसंच या देशात केवळ साडेतीन टक्के लोकसंख्या वगळता उर्वरित सारी लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने मागास म्हणूनच गणली जाते. अर्थातच हे विभाजन जाती/धर्माच्या निकषावर करण्यात आलंय. याचाच दुसरा अर्थ, साडेतीन टक्के इतकं प्रमाण असलेली विशेष जात मागास नाही बाकी साऱ्या जाती मागास आहेत आणि देशातील आतापर्यंत नमूद झालेल्या दाखलेबाज जातींची यादी देण्याची गरज सूज्ञ वाचकाला नाही. तर मग केवळ साडेतीन टक्के प्रमाण असलेल्यांना आरक्षित करून उर्वरित सगळ्या जातींना आरक्षणाच्या कचाट्यातून मुक्त का करत नाहीत?

पण हे इतकं सोपं नाहीय. याकरीता पुन्हा एका क्रांतीचीच गरज आहे. असो. तर असा हा "आरक्षण'चा मुद्दा या देशात सातत्याने चघळला जातोय. यात अपेक्षेप्रमाणे दोन गट आहेतच. एक आरक्षणाच्या समर्थकांचा आणि दुसरा विरोधकांचा. पण या दोन्ही गटांत आरक्षणाबाबतच्या ठाम भूमिकेचाच अभाव आहे. म्हणजे आरक्षणाला आपण विरोध का करतोय आणि समर्थन का देतोय हे अद्याप कोणीच स्पष्टपणे सांगू शकलेलं नाहीय. काही अभ्यासक याला नक्कीच अपवाद आहेत. मुद्दा असा आहे की, आपल्याकडे आरक्षण हा शब्द नुसता उच्चारला तरी समोर येतं ते शिक्षणक्षेत्र. शिक्षणक्षेत्रात केवळ आरक्षणामुळेच गोंधळ होतोय, असं एक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. मागासवर्गियांचे आरक्षणाच्या नावाखाली लाड पुरवले जाताहेत, खुल्या प्रर्वगातील लोकांचं आरक्षणामुळे मोठं नुकसान होतेय, आरक्षणामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात, उच्च अभ्यासक्रमांत प्रवेश दिला जातोय आणि यामुळे अमागास जातीतील विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळून सुद्धा प्रवेश नाकारला जातोय, असे अनेक चुकीचे समज आजही आरक्षणाच्याबाबतीत या समाजात जिवंत आहेत. यामुळे शिक्षणक्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील आरक्षणाविषयी कोणीच काही बोलत नाही. उदा. देशभरातील मंदिरात एका विशिष्ट जातीच्याच लोकांना पुजापाठ करण्याचा असलेला अधिकार हा मुद्दा आरक्षणाशी निगडीत नाही का? पण याकडे सोयीस्करित्या कानाडोळा केला जातो. असाच कानाडोळा प्रकाश झा यांनी "आरक्षण' या त्यांच्या बहुचर्चित सिनेमाच्या पटकथेकडे केला आहे.
देशभर वादळ उठवून प्रकाश झा यांनी "आरक्षण' प्रदर्शित केला. एका बड्या खासगी कॉलेजात आरक्षणाच्या मुद्यावरून कसा हलकल्लोळ माजतो हे दर्शवणारा हा सिनेमा आहे. शकुंतला ठकराल महाविद्यालय अर्थात एसटीएम नावाचं एक नामांकित कॉलेज असतं. ज्याचे प्राचार्य असतात डॉ. प्रभाकर आनंद (अमिताभ बच्चन). (डॉ प्रभाकर आनंद आणि "मोहब्बते'मधील गुरुकुलचे प्राचार्य नारायणशंकर यांच्यात तसूभरही फरक नाहीय.) याच कॉलेजात त्यांचा आवडता विद्यार्थी असतो दिपक कुमार (सैफ अली खान). दिपक कुमार मागासवर्गातील असूनही अत्यंत हुशार विद्यार्थी असतो. त्याचं प्रभाकर आनंदच्या मुलीशी, पुरबी (दीपिका पादुकोण)शी सूत जुळलेलं असतं. तिही याच कॉलेजात शिकत असते. (या प्रेमकहाणीत सुद्धा "मोहब्बतें'ची याद येते.) या दोघांचा अजून एक मित्र असतो सुशांत (प्रतीक बब्बर). सुशांत सवर्ण असतो. सारं काही सुरळीत सुरू असतं. सगळे विद्यार्थी, शिक्षक गुण्यागोविंदाने "एसटीएम' नामक बड्या कॉलेजात शिकत असतात. शिकवत असतात. पण अचानक सर्वोच्च न्यायालय ओबीसींच्या आरक्षणासंबंधी निकाल देतं आणि ओबीसी विद्यार्थ्यांचा एक गट मिरवणूक काढत कॉलेजात शिरण्याचा प्रयत्न करतो. कॉलेजचं वातावरण बिघडतं. दिपक कुमार आणि सुशांत आपापल्या जमातीच्या बाजूने भांडायला लागतात. रागाच्या भरात दिपक कुमार प्रभाकर आनंदवर जातीयवादाचा आरोप करतो. याचा राग येऊन पुरबी दिपक कुमारसोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकते. पुढे एका मंत्र्याच्या भाच्याला एसटीएममध्ये ऍडमिशन मिळत नाही. म्हणून तो मंत्री राजकीय खेळी खेळून प्रभाकर आनंद आरक्षणाच्या बाजूचा आहे असं कॉलेजच्या ट्रस्टींना सांगतो आणि प्रभाकर आनंदला प्राचार्य पदावरून पायउतार होण्यास भाग पाडतो. या राजकीय खेळाची दुसरी बाजू असते खासगी शिकवणी अर्थात कोचिंग क्लासेसचा बिझनेस. हा बिझनेस एसटीएममधील मिथिलेश सिंग (मनोज वाजपेयी) नावाचा प्राध्यापक करत असतो. याला एसटीएममध्ये परवानगी नसते. तर मिथिलेश सिंग आरक्षणविरोधी असतो. मंत्री, मिथिलेश सिंग आणि कॉलेजचे ट्रस्टी मिळून प्रभाकर आनंदला कॉलेजातून काढून टाकतात. त्याचं घरही बळकावतात. त्याच्या घराची मजेशीर गोष्ट आहे. खरं तर अशा अनेक मजेशीर गोष्टी या एकाच सिनेमात गुंफण्यात आल्यात. यामुळे एका क्षणाला प्रभाकर आनंदच्या बाजूची माणसं त्याच्या विरोधात जातात तर काही क्षणांच्या विश्रांतीनंतर तिच माणसं पुन्हा त्याला येऊन मिळतात. हे असं का होतं? याचं उत्तर पडद्यावर "दी एंड'ची पाटी झळकली तरी सापडत नाही. पुढे मग प्रभाकर आनंद स्वत:वर लावलेले सारे आरोप खोटे ठरवण्यासाठी एका तबेल्यात मोफत शिकवणी सुरू करतो. अर्थातच तो तबेला मागासवर्गियांच्या वस्तीत असतो. तो त्याच वस्तीतील विद्यार्थ्यांना मोफत शिकवू लागतो आणि चमत्कार होतो. कालपर्यंत पन्नास-पंचावन्न टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी साठ-सत्तर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होतात. याचा परिणाम मिथिलेश सिंगच्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवरही होतो. मग या दोघांमधील शीतयुद्ध अधिक पेटतं आणि सिनेमा शेवटाकडे प्रवास करू लागतो.
या सगळ्या गदारोळात दिग्दर्शक प्रकाश झा यांना ते आरक्षणाच्या मुद्यावर सिनेमा बनवताहेत याचा विसर पडतो. खरं तर यात दिग्दर्शकाची चूक नाहीय. त्यांना आरक्षणाचं निमित्त साधून शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचारावर "प्रकाश' टाकायचा होता. पण त्यांच्या पटकथेच्या स्पॉटचा लाईट चुकला. तो सिनेमाभर इथे तिथेच पडत राहिला. नेमक्या विषयावर तो "प्रकाश' पडला असता तर "आरक्षण'मधील एखादा तरी मुद्दा प्रेक्षकांच्या नजरेस पडला असता. आरक्षणावर मेरीट हे सोल्युशन म्हणून देण्याचा प्रकाश झा यांचा प्रयत्नही फसवाच वाटतो. तसंच प्रभाकर आनंद मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिकवणी घेतो म्हणून ते मेरीटमध्ये येतात का, असा प्रश्नही मेंदूत पिंगा घालू लागतो. कारण प्रभाकर आनंद सवर्ण असतो. पण त्याला समाजातील मागास घटकांबद्दल आत्मियता असते. सिनेमा मल्टी स्टारकास्ट आहे. यामुळे त्यांच्या अभिनयाबद्दल सांगण्यात काहीच मतलब नाही. अमिताभ बच्चन प्राचार्याची भूमिका छान वठवतात, हेही वेगळं सांगण्याची गरज नाहीय. मनोज वाजपेयीचा खलनायकही मस्त रंगलाय. तो जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा तेव्हा राग येतो. दीपिका पडद्यावर खुपच गोड दिसते. याचं श्रेय तिच्या ड्रेस डिझायनरला द्यायला हवं. अतिशय साध्या कपड्यात दीपिकाला पडद्यावर सादर करण्याचा वेशभूषाकाराचा निर्णय कामी आलाय. सैफचा मिशीवाला लूकही मस्त आहे. फक्त त्याने थोडासा अभिनय करून संवाद फेकले असते तर त्याची ती मिशी अधिक उठून दिसली असती. प्रतीक बब्बरला दिग्दर्शकाने नेमकं काय करायला सांगितलं होतं आणि तो काय करतो याचा थांगपत्ताच लागत नाही. कदाचित यात त्याची चूक नसेल. कारण पटकथेत साऱ्याच पात्रांचा गोंधळ उडालाय. पण एक कॉलेजकुमार म्हणून प्रतीक पडद्यावर मस्त दिसतो. सिनेमात अन्य पात्रही आहेत. यात तन्वी आझमी, विनय आपटे, हेमा मालिनी, यशपाल शर्मा यांचा समावेश आहे. सिनेमात दोन गाणी खुपच मस्त आहेत. एक म्हणजे "सीधे लाईन पे आओ ना...' आणि "इक मौका दे दो...' हे दुसरं गाणं. मात्र प्रसून जोशीने लिहिलेली आणि शंकर, एहसान, लॉय या त्रिकुटाने संगीत दिलेली ही दोन्ही गाणी वाया गेलीत. अन्य गाण्यांच्या बाबतीतही तेच घडलंय. गाण्यांचं प्लेसिंगच चुकलंय. खरं तर प्रकाश झा यांनी लिहिलेल्या सिनेमाच्या कथा, पटकथेचंही प्लेसिंग चुकलंय, असंच म्हणावं लागेल. कारण इतके दिवस आरक्षण... आरक्षण करून डंका पिटवल्यानंतर हाती काहीच लागत नसेल तर मग डोंगर पोखरून उंदीर काढला असं म्हणण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही.

- राकेश शिर्के (सांध्य)

No comments:

Post a Comment